बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मुरकुटे व श्रीराम समर्थ पतसंस्थेचे संचालक सुधाकर धनकुडे यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, मुलांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून व कर्तुत्ववान मुलांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेल्या 11 विद्यार्थ्यांना आज संस्थेच्या वतीने प्रत्येकी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे हाच यामागील हेतू आहे. आतापर्यंत संस्थेने 210 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थ्यांमधून 12 वी च्या परीक्षेत 90% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील उच्च शिक्षणाचा खर्च संस्थेच्या वतीने करणार आहोत. याच बरोबर संस्था विविध प्रकारे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.























