कोंढवा पोलीस ठाण्यात सामुदायिक बैठक; वाहतूक आणि पाणी समस्यांवर तोडग्याचे आश्वासन

पुणे :  दक्षिण पुण्यातील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात आज एक महत्त्वपूर्ण सामुदायिक बैठक पार पडली. एनआयबीएम ॲनेक्स, मोहम्मदवाडी आणि उंद्री परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाईसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनासमोर आपली भूमिका मांडली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, डीसीपी (वाहतूक) हिम्मत जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. चर्चेदरम्यान नागरिकांनी विशेषतः अवजड पाण्याच्या टँकरमुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक वाहतुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या टँकरच्या अनियमित हालचालींमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

रहिवासी राज सिंग, शमिम हासिमखान पठाण, छबिल पटेल, अशोक मेंडाळे आणि शहनवाज शेख यांनी या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर प्रतिसाद देताना डीसीपी हिम्मत जाधव आणि अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी टँकर वाहतुकीसाठी वेळापत्रक निश्चित करणे, वेगमर्यादा कडक करणे आणि उच्च-जोखमीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्याचे संकेत दिले.

दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पीएमसीच्या पाणी विभागाचे प्रतिनिधी अधिकारी जगताप यांनी नागरिकांना दिलासा देताना सांगितले की, पुढील एका महिन्यात तीन मोठ्या पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्या जातील. या टाक्यांमुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित होऊन खाजगी टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनांचे नागरिकांनी स्वागत केले असून, निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीमुळे पोलीस, पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन दक्षिण पुण्यातील जीवनमान सुधारण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले असल्याचे चित्र दिसून आले.

See also  बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा-डॉ.नीलम गोऱ्हे