भोर: राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भोर येथे जाऊन दिवंगत अनंतराव थोपटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. भोर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थोपटे कुटुंबियांची, प्रामुख्याने त्यांचे सुपुत्र माजी आमदार संग्राम थोपटे व इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
या प्रसंगी दुःख व्यक्त करताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अनंतराव थोपटे यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रातील एक झुंजार नेतृत्व हरपले आहे. भोर-वेल्हा-मुळशी या दुर्गम भागाच्या विकासासाठी आणि विशेषतः शिक्षणाचा प्रसार व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.















