भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

पुणे : आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरी, राजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय घेतला आहे, असा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम, राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटके, माजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, रोहित पवार, माजी आमदार उल्हासदादा पवार, दीप्ती चवधरी, जयदेव डोळे ,अशोक पवार, माजी उपमहापौर अंकुश काकडे, रोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.


काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असो, अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

     शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणाले, पन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झाले, आज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले, 410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते, उलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

  जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

See also  स्मार्ट सिटी बालेवाडी बाणेर येथील साई चौकातील एकमेव भाजी मंडई खुली करावी : आप

सुषमा अंधारे म्हणल्या, मोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सचिन अहिर म्हणाले, ही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले, आमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असता, त्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अमोल कोल्हे म्हणाले, आत्ता फक्त ट्रेलर दाखवतो, पिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.देशातल्या जनतेचं ठरलंय, बळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?
कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिली, नंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारली, उशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झाले, अठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

विश्वजित कदम म्हणाले, सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

बाळासाहेब थोरात म्हणले, ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होती, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवा, हे ध्येय बाळगून काम करा, असे आवाहन यावेळी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, असे म्हणतात. मात्र, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होती, तशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहे, आपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.