बालेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे साजरी करण्यात आली. शिवचरित्राचे अभ्यासक पुरुषोत्तम आवारे पाटील ( अकोला) यांनी “शिवराय-सत्य आणि संभ्रम” या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज हे एकच असे राजे होऊन गेले की आजही आम्हा सर्वांना वाटते की हा राजा परत परत व्हावा. याचे कारण ते केवळ राजे नव्हते तर रयतेची काळजी घेणारे जाणते राजे होते. जमिनीची मोजणी, स्वराज्याचे आरमार, सैन्याला पगार देणे, शेतकऱ्यांना वेळो वेळी मदत करणे, स्रियांचा सन्मान अशा कितीतरी कल्याणकारी कामं त्यांनी केली. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र गृहनिर्माण सहकारी संस्था व अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन होते. त्यांनी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि गृहनिर्माण संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला हवेत त्यामुळे समाजात सहजीवन आणि बंधुभाव आणि आपुलकी निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त फेडरेशन तर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बीडब्ल्एफ सिटिझन्स अवार्ड ने गौरविण्यात येते. यावर्षी प्रसाद नारायण ( शैक्षणिक कार्य ) आणि सौ. किरण संगित गुडदे ( शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व महिला सशक्तीकरण) यांना हे अवार्ड देण्यात आले.
शिवचरित्रावर विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याला बाणेर बालेवाडीतून मोठा प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना बक्षिसे तर सर्वांना सहभाग प्रमाणपत्र दिले गेले. शुभांगी चपाटे यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मानस शर्मा यांनी स्वागत केले तर आशिष कोटमकर यांनी प्रस्तावना केली. मृणाल गायकवाड यांनी सुत्रसंचलन केले. मोरेश्वर बालवडकर यांनी आभार मानले.रमेश रोकडे, वैभव आढाव, दफेदार सिंह, योगेंद्र सिंह, इंद्रजित कुलकर्णी, वंदना चौधरी, सुनील गाळणकर, यश चौधरी, शैलेश पाटील, रुपाली रायकर, शकिल सलाती, सचिन पाटील व योगेश डुंबरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
























