पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी पुणे शहराला भेट दिली. तसेच मागील आठवड्यामध्ये मा. सपकाळ साहेब यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेस भवन येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंसक मोर्चा काढून दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस व सत्कार प्रदेशाध्यक्ष मा. सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर व पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘मला लाज वाटते की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजकीय टिपणी आणि बदला घेण्याकरीता खोटे बोलतो. आपल्या महाराष्ट्राची आण-बाण-शान व स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खोटे बोलण्याचे पातक जर देवेंद्र फडणवीस करीत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. आपल्या बाजूला शौर्य व इतिहास आहे. दुर्दैवाने फुटीर वादाचा इतिहास देखील आपल्याला थोड्या काळाचा आहे, परंतु एक लक्षात असू द्यात जे उडून गेले ते कावळे व जे उरले ते खरे मावळे. पुण्यात असलेल्या केंद्रातील एका मंत्र्याने तर आपल्या आजच्या मेळाव्याचे समजताच सर्व बैठका रद्द करून १०-१० मिनिटाला माहिती घेत होते. पुणे शहर काँग्रेसच्या मेळाव्याच धसका भाजपाच्या नेत्यांनी घेतलेला दिसून येतो. पुण्याच्या पावन भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरविण्याचे पातक इतिहासात करण्यात आले होते, याच मनुवादी विचारांचा माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळात स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला सोन्याचा नांगर फिरवायचा आहे. मनुवृत्ती ही गाढवाचा नांगर तर संविधान हे सोन्याचा नांगर आहे. पोलीसांनी सुध्दा लक्षात असू द्यावे त्यांचे ब्रीद वाक्य ‘सद रक्षणाय् खल निग्रनाय्’ असे आहे. नव्या परिवर्तनाची सुरवात पुण्यातून झाली आहे आणि त्याची कास धरून आपल्याला पुढे जायचे आहे.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्राची दुधाने यांनी केले तरी आभार माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले. यावेळी मेळाव्यास काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
























