मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक नसल्यास मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दरड कोसळलेल्या ठिकाणी सुमारे १०० टन मलबा साचला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारची दरड न कोसळलेल्या भागात ही घटना घडली आहे. आतापर्यंत सुमारे ७० टन मलबा हटविण्यात यश आले असून उर्वरित मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एकाच लेनमधून वाहतूक सुरू असून, पुढील दीड तासात आणखी मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी उपस्थित असून, संबंधित विभाग, यंत्रणा आणि आपत्कालीन पथके समन्वयाने काम करत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच प्रवास करण्याचे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
















