हातकंणगले ( प्रतिनिधी ) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतक-यांचे संपुर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतक-यांची कर्जमाफी करता येणार नाही असे सांगून करून शेतक-यांची फसवणूक केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मजले ता. हातकंणगले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी ५ च्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली-कोल्हापूर महामार्गावर मजले येथील स्टार पेट्रोलपंपाशेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. राज्यात दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. विधानसभा निवडणुका संपून जवळपास ८ महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस , दुष्काळ , वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपुर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.