श्रेय वादाच्या २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनानंतर तरी पाणी मिळणार का?- वंचित बहुजन आघाडी

बाणेर : पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालेवाडी परिसरामध्ये 24×7 पाणीपुरवठा योजना पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व सुस महाळुंगे गावातील 70 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले अनेक महिने पाणी प्रश्नावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका करणारे राष्ट्रवादी व भाजपाचे माजी नगरसेवक एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. तसेच पाणीपुरवठा योजनेच्या श्रेया वरून चर्चा पाहायला मिळत आहे यावर टीका करत विरोधक व सत्ताधारी यांचे पहाटेचे सरकार हे नागरिकांना आता तरी पाणी देणार का असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाणी प्रश्नावर टीका केली आहे.
बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाणी प्रश्नाचे भांडवल करून राष्ट्रवादी व भाजपाचे नगरसेवक सर्व सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत. एकीकडे 24×7 योजनेचे उद्घाटन होत असताना पुणे शहरात एक दिवस पाणी न सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गाव परिसरात शेकडो पाण्याच्या टाक्या बसवून त्यामध्ये पाणी सोडले जात नसल्याची वस्तुस्थिती देखील नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे.
नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याऐवजी विरोधी पक्षातील नेते देखील प्रशासनाच्या व्यासपीठावर उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होत असून अशा फसव्या घोषणा होत असताना नागरिकांचा प्रश्न न सुटल्यास याचे श्रेय कोण घेणार असा सवाल देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहर संघटक सतीश रणवरे, शहर उपाध्यक्ष विकास भेगडे यांनी उपस्थित केला आहे.
सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी प्रश्नाबाबत नागरिकांची मोठी उद्घाटने घेऊन फसवणूक होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्यता सांगण्यासाठी “जल” जन आंदोलन लवकरच सुरू करणार असल्याचे यावेळी सतीश रणवरे यांनी सांगितले.

See also  उत्तम प्रशासन मानवाधिकाराचे कवच-डॉ.ज्ञानेश्वर मुळे