संसद भवन परिसरात खासदार चंद्रशेखर आझाद यांचे धरणे; विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या, खासदार ओवैसी यांनी घेतली भेट

नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवावा, या मागण्यांसाठी खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली रात्रीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या धरणे आंदोलनामुळे संसद परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आज या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात असून, या विषयावर संसदेत चर्चा करण्याची मागणीही जोर धरत आहे. मात्र, या प्रकरणावर केंद्र सरकारची सविस्तर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

See also  बाणेर-बालेवाडी येथील सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनला यश: मानले चंद्रकांत पाटील यांचे आभार