पुणे, प्रतिनिधी – सोलापूर मध्ये विविध जाती-धर्माचे नागरिक शेकडो वर्षांपासून राहत आहेत. या शहरांमध्ये एका वर्षातील 187 दिवस विविध सण उत्सव साजरे केले जातात. यामुळे डीजे सारख्या अपप्रवृत्ती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोलापूरकरांना नवीन नव्हत्या. या समस्या हाताबाहेर गेल्यामुळे डीजे मुक्त सोलापूर कृती समिती निर्माण झाली आणि त्यातून लोक चळवळ उभी राहिली . या लोक चळवळीतूनच सोलापूर शहरांमध्ये डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे . डीजे मुक्त गणेशोत्सवाचा सोलापूर पॅटर्न हा लोकजागृतीतून संपूर्ण महाराष्ट्रात शक्य साजरा करता येऊ असा विश्वास या चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी व्यक्त केला.
ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाचा सोलापूर पॅटर्न निर्माण करणारे सिद्धराम पाटील यांची जागरूक पुणेकर नागरिक समितीतर्फे सौरभ वीरकर यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते यावेळी सिद्धाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत , नगरसेवक कुणाल टिळक, नितीन पंडित, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, निलेश धायरकर ,अशोक तिडके आदि यावेळी उपस्थित होते.
सिद्धाराम पाटील म्हणाले, सोलापूर शहरातील एका नागरिकाला झालेल्या त्रासातून डीजे मुक्त गणेशोत्सव ही चळवळ उभी राहिली. या चळवळीमध्ये विद्यार्थी ,पोलीस वकील ,डॉक्टर आदि विविध घटकातील तीन लाखांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले. ही केवळ एक जनभावना उरली नाही तर लोक चळवळ निर्माण झाली. डीजे बंदी म्हणजे साऊंड सिस्टिम बंदी अशी भूमिका नाही तर साऊंड सिस्टिम हे सण उत्सव साजरे करण्यासाठी गरजेचे आहेत परंतु त्याचा अतिरेक झाला नाही पाहिजे ही भावना सर्वांना समजावून सांगितली तर सर्व घटक या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात.
एका शहरातील मूठभर व्यक्ती एखादी सकारात्मक चळवळ जर हाती घेतली आणि त्या चळवळीला सातत्य प्रामाणिकपणा यांची जोड असेल तर ती चळवळ यशस्वी होऊ शकते. पुण्यासारख्या मोठ्या शहरातील गणेशोत्सवातील अपप्रवृत्ती आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. या लोक चळवळीचा रेटा इतका मोठा असला पाहिजे की त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांचाही पाठिंबा या चळवळीला मिळू शकेल असेही सिद्धाराम पाटील यांनी यावेळी सांगितले.
सौरभ वीरकर म्हणाले, गणेशोत्सवातील अपप्रवृत्ती आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास या समस्या चर्चेतून सुटू शकतात यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते. संपूर्णतः डीजे बंदी हा पल्ला लांबचा आणि अवघड असला तरी त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत . कोणाच्याही भावना न दुखावता सर्वांना सोबत घेऊन गणेशोत्सव अधिकाधिक विधायक पद्धतीने साजरा व्हावा ही आमची भूमिका आहे.
विधायक पद्धतीने सार्वजनिक उत्सव साजऱ्या करणाऱ्या आदर्श बाल मंडळ भवानी पेठ, किंग्स बॉईज ग्रुप दहीहंडी व शिवजयंती उत्सव, कासार समाज गणेश उत्सव मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समता प्रतिष्ठान, जय बजरंग मित्र मंडळ या मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सौरभ वीरकर यांनी प्रास्ताविक केले. सुमित डोळे यांनी सूत्रसंचालन केले.
















