आपल्या विचाराप्रती श्रध्दा, निष्ठा असेल तर माणूस मृत्यूनंतरही जिवंत असतो : उच्च- तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : संपूर्ण पुणे शहराचे ‘आबा’ आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले, मात्र त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे चिरंजीव सनी निम्हण हे योग्य प्रकारे चालवत असल्याने आबा मृत्यूनंतरही जिवंत असल्याची जाणीव होत राहते. यातूनच आबांचे विचार काय होते? हे लक्षात येते.आपल्या विचाराप्रती श्रध्दा, निष्ठा असेल तर माणूस मृत्यूनंतरही जिवंत असतो हे समाजकार्यातून दिसून येते.” अशी भावना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. सोमेश्वर फाउंडेशन तर्फे कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ३६८ गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायकी’ विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीचे वाटप , बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले, यावेळी पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, ” जर्मनी या देशात चार लाख तरूणांची आवश्यकता असून यासाठी सहा मंत्र्यांचे गट स्थापन केले आहेत. त्यावर सरकार काम करत आहे. सोमेश्वर फाउंडेशन तर्फे दिलेल्या शिष्यवृत्तीचा मुलांना चांगला फायदा होईल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात आयोजक सनी निम्हण म्हणाले, “आबांनी दिलेली शिकवण, त्यांच्या समाजकार्याचा वारसा वसा म्हणून, पुढे चालू ठेवत आहोत. कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने, अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत हे शिष्यवृत्ती वाटपाच्या निमित्ताने लक्षात आले. सर्वांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य मिळावे यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे चालू ठेवू.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब मुजुमदार म्हणाले,” माणसाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आरोग्य आणि शिक्षण हेच दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी ओळखले होते. निम्हण यांनी राजकारणात करत असताना समाजकारणाचा भाग सोडला नाही. देतो तो देव, राखतो तो राक्षस या म्हणीप्रमाणे निम्हण गरजूंना मदत देत राहिले. त्यांचा वारसा सनी निम्हण यांनी चालू ठेवला असून ही कौतुकाची बाब आहे.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले,
“एखाद्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते अशा लोकांचा भविष्यकाळात उज्वल असतो. सध्या नैतिकतेच्या शिक्षणाचा अभाव दिसून येतो, शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नैतिकतेची जोपासना केली तर शिष्यवृत्ती मिळाल्याचे सार्थक होईल. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर ,पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर,आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजित तांबे ,माजी मंञी सुरेश नवले , यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन मिलिंद कुलकर्णी व अमित मुरकुटे यांनी केले तर आभार उमेश वाघ यांनी मानले.

See also  अनुसया यशवंत नांदेडकर यांचे निधन