इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू : पृथ्वीराज चव्हाण – निवडणुक रोख्यातून जगातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप

पुणे : ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.


पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

See also  खड्डे बुजविणे आणि वाहतूक नियंत्रण याचे एकत्रित नियोजन करा : मोहोळ