पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात एक आगळावेगळा, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि सन्मान करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र शासनाचा “कृषीभूषण” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती सर्जेराव गुंडा पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्यासह उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये नंदकुमार वांजारी, अशोक पाटील, भुजंगराव महाडिक, जयसिंग गुंडा पाटील आणि संजय पाटील यांचाही महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले की, “ज्ञान आणि भक्ती यांचा समतोल साधणाऱ्या या परंपरेतून सर्वांनी मूल्याधारित शिक्षणाची प्रेरणा घ्यावी, हीच यामागची खरी भावना आहे.”
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण महाविद्यालय परिसरात श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्मिक भावनेची लहर निर्माण झाली.
या विशेष प्रसंगाबद्दल सर्व वारकऱ्यांनी भारती विद्यापीठाचे मनःपूर्वक आभार मानले. विशेषतः त्यांनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल आणि समाजाभिमुख विचारधारेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकी, आध्यात्मिक मूल्ये आणि सेवाभावी वृत्ती यांचे सुंदर प्रतीक ठरला.