स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने देशात सिद्ध केले आपले वर्चस्व

नवी दिल्ली  : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने देशात आपले वर्चस्व सिद्ध केले. राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून मीरा-भाईंदर महापालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विज्ञान भवन येथील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. राज्यमंत्री मिसाळ यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व विजयी शहरांचे अभिनंदन केले. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्याचा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया आहे. सफाईमित्रांचे योगदान उल्लेखनीय असून, मॅनहोलऐवजी मशीन-होलचा वापर वाढवण्याचेही राष्ट्रपतींनी आवाहन केले.

महाराष्ट्रातील विविध शहरांची कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली.

🔴 स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनात #मीराभाईंदर महापालिकेने ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले.

🔴 #कराड नगरपालिकाने ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले.

🔴 १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात #नवीमुंबई महापालिकेने ‘सुपर स्वच्छ लीग सिटी’ पुरस्कार पटकावला.

🔴 ५० हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात लोणावळा नगरपालिकाने, २० ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात विटा नगरपालिका (जि. सांगली), सासवड नगरपालिका (जि. पुणे) आणि देवळाली प्रवरानगर नगरपालिका (जि. अहिल्यानगर), तर २० हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात पाचगणी (जि. सातारा) नगरपालिका आणि पन्हाळा नगरपालिका (जि.कोल्हापूर) या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले.

🔴 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनेही मिळवली आहेत.

महाराष्ट्राने कचरा व्यवस्थापन, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे. मीरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर रंगल्या मातीतल्या गप्पा! नावलौकिक केलेल्या माजी पैलवान व गुरूवर्य यांचा सन्मान