पुणे : प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आयोजित रॅली ही केवळ प्रचारासाठी नसून विजयाचीच नांदी असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी व्यक्त केले. या रॅलीला नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि विश्वासाने प्रतिसाद दिला, असेही त्यांनी सांगितले.
प्रभागातील चारही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत मोहोळ म्हणाले की, प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल. भाजपचा कार्यकर्ता विचाराने चालतो, संस्कृतीने काम करतो आणि निष्ठेने सेवा करतो, हीच भाजपची ओळख आहे. भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष आणि विचारसरणीला सर्वोच्च स्थान दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाला दिलेला पाठिंबा असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. भाजपमधील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेचा विश्वास संपादन करणारा असून, विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रभाग क्रमांक ०९ हा भाजपचा बालेकिल्ला असून येथील मतदार कमळ चिन्हालाच मतदान करतील, असा विश्वास व्यक्त करत १६ तारखेला हा प्रभाग ४–० ने भाजपच्या पारड्यात जाणार असल्याचा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.
























