पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी ना. पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आज फूट आणि आधुनिक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. कधी काळी दुसऱ्याच्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू न शकणारे बांधव जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू चंद्रकांतदादांच्या संवेदनशीलतेची पावती देत होते.
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” हा समतेचा आणि सेवेचा मंत्र दिला आहे. समाजाचे काम हे स्वतःच्या पोटाला झळ पोहोचल्याशिवाय उभे राहत नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची व्याप्ती वाढवून स्वयंसेवी संस्थांना बळ दिले पाहिजे. तसेच, स्वयंसेवी संस्थांनी आपले काम हे ‘मिशन मोड’वर केले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे केवळ विकासकामांसाठीच आग्रही असतात असे नाही, तर ते देश आणि संस्कृती संवर्धनासाठीही नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याशिवाय गरजू लोकांसाठी ते सदैव कार्यतत्पर असतात, अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक कार्यासाठी महापालिका नेहमीच आपल्या पाठीशी असेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
मोनिका मोहोळ म्हणाल्या की, चंद्रकांतदादा हे समाजाचे पालनकर्ते आहेत. शंभर टक्के समाजकारणावरच त्यांचा भर असतो. त्यांनी आपल्या कामातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम फ्यूप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमिष मेहरा, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, राजेंद्र जोग, विश्वस्त आणि दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील नगरसेवक भाजपचे सर्व पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
*विजेच्या धक्क्याने दिव्यांगत्व आलेली तृप्ती धावू लागली*
पुण्यातील कासारसाई मध्ये राहणारी तृप्ती स्वामी (वय ९) हिला १८ मे २०२५ रोजी विजेचा तीव्र धक्का लागून अपघात झाला होता. या अपघातात तिला आपला पाय गमवावा लागला होता. तिचे वडील बांधकाम कामगार आहेत. त्यामुळे कुटुंबावर देखील मोठा आघात झाला होता. अपघाताने दिव्यांगत्व आल्याने तृप्तीच्या भविष्याबाबत चिंता निर्माण झाली होती. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या फिटमेंट कॅम्पमुळे आज तृप्ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली आहे. कृत्रिम पाय बसवल्यानंतर चक्क ती धावू लागली.























