नदी सुशोभीकरण करताना  पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीला प्राधान्य द्या -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पुणे : राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व  प्रदूषणमुक्तीला प्राधान्य द्यावे असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत पुणे शहरातील मुळा- मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समितीचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या, अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. पुणे शहरातील सर्व सुरु असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जातील, त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी.

त्या पुढे म्हणाल्या, औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा, विभागांचा अभ्यास करुन नवीन धोरण आणले जाईल. बारामती येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

बैठकीत श्री. नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महानगरपालिका हद्दीत निर्माण होणारे मैलापाणी व प्रक्रिया क्षमता,अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्या व कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती,प्रकल्पातील अडथळे, वारजे,वडगाव, मुंढवा, मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राची माहिती सादर करण्यात आली.

See also  औंध डिपीरोड परिसरात पालिकेनेच मोकळ्या जागत टाकला कचरा