पुणे : मध्यंतरी आम आदमी पार्टीच्या गुजरात मधील फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट भाजप सरकारने बंद केल्याचा आरोप केला होता.आता महाराष्ट्रातील आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आरक्षण दुरुस्ती बिल विषयी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची निंदानालस्ती करणारी काही विधाने आणि आम आदमी पार्टी सोडणारे खासदार राघव चड्डा यांच्यावरती आपचे प्रवक्ते मुकुंद यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केल्या गेल्या होत्या. त्यामधूनच केंद्र सरकारने 25 एप्रिल रोजी तातडीने इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बंद केल्याचे समोर आले आहे. याबाबत मेटा प्लॅटफॉर्म ने हे अकाउंट भारत सरकारच्या नोटीस मुळे बंद केल्याची माहिती या अकाउंट वर दिसते. याबाबत माहिती तंत्रज्ञान कलम 79(3) ब चा वापर करून सरकारने हे अकाउंट भारतात बंद केले आहे.
यावर आम आदमी पार्टी व मुकुंद किर्दत यांनी जोरदार टीका केली असून जनतेचे प्रश्नांना मांडल्यामुळे आणि सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या इंस्टाग्रामवर संविधानाच्या चौकटीमध्येच हक्क बजावत पोस्ट केल्या गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये सरकार चे नियंत्रण आहेत परंतु आता सोशल मीडियावर सुद्धा आम आदमी पार्टीचा विचार प्रसार होऊ नये यासाठी या सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसते आहे. परंतु या दडपशाही विरोधात जाऊन आम आदमी पार्टी गुजरात, महाराष्ट्र व देशभर ही लढाई चालूच ठेवेल असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत मुकुंद किर्दत यांनी सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधून सरकारला नोटीस पाठवली आहे. सरकारने या कलमाचा वापर करण्याआधी आप चे मुकुंद किर्दत यांना नोटीस पाठवून प्रसिद्ध केलेल्या मजकुरा विषयी खुलासा मागवायला हवा होता. सरकारने ही बेकायदेशीर बंदी न हटवल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल असे अँड.असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
















