पुणे : कर्नाटकातील दावणगेरे जिल्यात होदिगेरे येथे असलेल्या श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर अखेर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली असून, शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात आहे. विशेष म्हणजे, हे महत्त्वपूर्ण कार्य पुण्यातील मल्हार भक्त आणि इतिहासप्रेमी डॉ. गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे पुणेकरांसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील असून स्वराज्याच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र त्यांच्या समाधीस्थळाची अवस्था अनेक वर्षे अत्यंत दयनीय होती. समाधीवर कोणतेही संरक्षणात्मक छत नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट मारा सहन करावा लागत होता. शिवभक्तांकडून अनेकदा संवर्धनाची मागणी करण्यात आली होती. कर्नाटक सरकारकडून आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत शिवप्रेमींमध्ये होती.
ही बाब लक्षात घेऊन श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी पुढाकार घेत समाधीवर स्वखर्चाने भव्य मेघडंबरी उभारण्याचा संकल्प केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रविवार, २४ मे २०२६ रोजी सुमारे साडेचार लाख रुपये स्वखर्च करून तब्बल ४५० किलो वजनाची मजबूत आणि आकर्षक मेघडंबरी समाधीवर बसविण्यात आली. हे संपूर्ण काम “वेडात मराठे वीर दौडले ७” या मावळ्यांच्या सहकार्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, हे काम अवघ्या एका रात्रीत गनिमी काव्याच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. कामादरम्यान अनेक तांत्रिक अडचणी, वाहतुकीची समस्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र छत्रपतींच्या प्रेरणेने आणि शिवभक्तांच्या जिद्दीमुळे हे ऐतिहासिक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची भावना सहभागी मावळ्यांनी व्यक्त केली.
“छत्रपतींच्या इतिहासाचे आणि वारशाचे जतन करणे ही प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे. आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे,” श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून १८ वर्षापासून अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत असे डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी सांगितले.
















