परीक्षा घोटाळे, पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात पुण्यात युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या उपस्थितीत मशाल आक्रोश मोर्चा

पुणे : देशातील युवकांचे भविष्य अंधारात लोटणाऱ्या परीक्षा घोटाळे, पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात भव्य मशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन ते झाशी राणी चौक (बालगंधर्व चौक) या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो युवक, विद्यार्थी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, महासचिव व प्रभारी अजय छिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,राष्ट्रीय सचिव नवज्योत संधू, शांभवी शुक्ला, तारिक बागवान, स्वप्निल पाटील, माध्यम प्रमुख अक्षय जैन, उपाध्यक्ष प्रशांत ओगले, तन्वीर विद्रोही, प्रथमेश बागवे, आफरीन शेख, आमिर अब्दुल, अनुराग भोयर, संघटन सरचिटणीस प्रवीण बिरादार, विवेक गावंडे, गणेश उबाळे आदी उपस्थित होते.

मोर्चादरम्यान सहभागी युवकांनी हातात मशाली घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पेपरफुटी बंद करा”, “युवकांना न्याय द्या”, “रोजगार द्या”, “विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मशाल आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या युवकविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी उपस्थित युवकांना संबोधित करताना सांगितले की, “आज पुण्यात पेटलेल्या मशाली केवळ महाराष्ट्रातील युवकांचा आक्रोश नाहीत, तर देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आणि बेरोजगार युवकांच्या वेदनेचे प्रतीक आहेत. गेल्या काही वर्षांत एकामागून एक परीक्षा घोटाळे, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे देशातील तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. युवकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेला युवक काँग्रेस देशभर जाब विचारणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा; अन्यथा पंतप्रधानांनी त्यांची हकालपट्टी करावी. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत आणि प्रत्येक तरुणाला समान संधी मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा संघर्ष रस्त्यावर आणि संसदेत सुरू राहील.”

See also  जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या सांगितले की, “देशातील तरुणांना रोजगार, शिक्षण आणि संधी देण्याऐवजी त्यांच्या स्वप्नांची राख करण्याचे काम सत्ताधारी सरकार करत आहे. स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेमधील गैरप्रकार हे केवळ प्रशासकीय अपयश नसून लाखो युवकांच्या आयुष्याशी केलेला विश्वासघात आहे. युवक काँग्रेस हे अन्याय सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हक्कांसाठी राज्यभर तीव्र संघर्ष उभारला जाईल.”

यावेळी परीक्षा प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणणे, पेपरफुटी आणि गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करणे, रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती करणे, बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे ठोस धोरण जाहीर करणे तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

मोर्चामध्ये राज्यभरातून आलेले युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मशाल आक्रोश मोर्चा पार पडला.