पुण्यात मोदींच्या फोटोसोबत जोडलेला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा कितपत यशस्वी ठरणार ?

पुणे : फुले शाहू आंबेडकर विचारांच्या यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या महाराष्ट्रामध्ये मोदींचा फोटो देखील याच विचारवंतांच्या जाहिरातीखाली घ्यावा लागतो. तेव्हाच केंद्रातील सत्तेचे गणित जुळते. हा विचार कदाचित भाजपाच्या हिंदुत्ववादी शैलीमध्ये वावरणाऱ्या नेतृत्वांना पटला असेल म्हणूनच अजितदादांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर विचार राजकीय गणिते बसवण्यासाठी स्वीकारला गेला असेल. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या हिंदुत्ववादी स्वयंसेवकांना तसेच भाजपाशी जोडलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हा विचार कितपत पटला असेल व याबाबत याचा मतदानावर किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुती म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी विचार अशीच भूमिका आतापर्यंत पाहायला मिळत आली आहे. परंतु राजकीय पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार) यांनी वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत मध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांसोबत असल्याचे दाखवण्यासाठी राज्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोसह फुले शाहू आंबेडकर यांचे फोटो वापरले. यामुळे पारंपारिक भाजपाचा मतदार काहीसा नाराज झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतभर हिंदुत्वाची भूमिका प्रखरतेने मांडत असताना महाराष्ट्रात मात्र अशा पद्धतीने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मते मागण्याची वेळ का आली असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना भाजपाच्या विचारसरणीमध्ये स्थान देऊन सामान्य जनतेचे मत भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. तसाच प्रयत्न फुले शाहू आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांचे फोटो मोदींसोबत जोडून केला जात आहे.

पुणे लोकसभा मतदार संघामध्ये दोन राष्ट्रीय पक्षांची समोरासमोर लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसोबत जोडलेला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.तर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतील महाराष्ट्र व देश घडवण्यासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न असणार का? आणि या विचारधारेला भारतीय जनता पार्टीचा पारंपारिक मतदार स्वीकारणार का? या भूमिका या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहेत.

See also  औंध (जि. पुणे) येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा झालेला मृत्यू प्रकरणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्‍त - आमदार भिमराव तापकीर