सारथी संस्थेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पुर्ण न झाल्यामुळे स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन

पुणे  : स्वराज्य पक्षाच्या वतीने पुण्यातील सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) अशोक काकडे यांच्या दालनात गोंधळ करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलवण्याची मागणी करण्यात आले. स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्व आंदोलन करण्यात आले.

सारथी संस्थेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पुर्ण न झाल्यामुळे स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सारथी संस्थेच्या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘सारथी संस्थेसमोर झोपा काढो’ आंदोलन करण्यात आले.

सारथी संस्थेकडे स्वराज्य पक्षाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी शासन निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय व अमृत या संस्थांच्या कार्यक्रमात समानता आणण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु महाज्योती च्या वतीने UPSC साठी १७५० विद्यार्थ्यांसाठी, MPSC साठी १५०० विद्यार्थ्यांसाठी आणि MPSC गट ‘ब’ आणि ‘क’ साठी ७५० विद्यार्थ्यांसाठी जाहिरात काढली जाते मग सारथी का काढू शकत नाही? सारथी ने तात्काळ विद्यार्थ्यांची संख्या मागणीनुसार महाज्योती इतकी करावी.

MPSC, UPSC आणि MPSC गट ‘ब’ आणि ‘क’ साठी देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा कालावधी महाज्योती देत विद्यार्थ्यांना देत असणाऱ्या कालावधी इतकाच म्हणजे MPSC साठी ११ महिन्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये, MPSC गट ‘ब’ आणि ‘क’ करिता ८ महिने प्रत्येकी १० हजार रुपये करावा.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणातील प्रमाण कमी आहे, असा अहवाल शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या न्या. गायकवाड आयोगाने दिला होता. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणातील प्रमाण वाढावे यासाठी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात यावी.
PhD २०२२-२३ करीता काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार १३१२ विद्यार्थी पात्र झाले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.  सारथी संस्थेची माहिती, संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना तळागाळातील युवकांपर्यंत नेण्यासाठी बार्टी  संस्थेत ज्या प्रमाणे समता दुत नेमलेले असतात त्या प्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तारादुत प्रकल्पाच्या माध्यमातून सारथी मध्ये असे प्रकल्प राबविले जात होते मात्र आता तारादुत प्रकल्प थांबविण्यात आले आहे. सारथी संस्थेच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायच्या असल्या तर बार्टी च्या धर्तीवर तारादुत प्रकल्प राबविला पाहिजे. तारादुत ऐवजी सारथी दुत किंवा शाहू दुत या नावे जरी प्रकल्प राबविला तरी काही हरकत नाही.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त (२०२२-२३) सारथी संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक काढण्यात येणार होते तसेच तालुक्याच्या ठिकाणी व्याख्याने, कौशल्य विकास अवेरनेस कार्यक्रम राबविण्यात येणार होते. जन्मशताब्दी वर्ष संपून १ वर्ष झाले तरीही संस्थेच्या वतीने एकही उपक्रम पुर्ण होत नसेल तर संस्थेसाठी ही खेदाची गोष्ट आहे. कौशल्य विकास कार्यक्रमासाठी मराठवाडा भागात सारथी च्या वतीने IGTR योजनेच्या व्यतिरिक्त कोणते उपक्रम राबवण्यात आले? मराठा समाजातील युवकांचे रोजगाराचे प्रमाण वाढावे याकरिता किती रोजगार मेळाव्यांचे सारथी च्या वतीने आयोजन करण्यात आले? किती रोजगार मेळाव्यामध्ये संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहिले?

सारथी च्या विविध योजना जिल्हास्तर, तालुकास्तरापर्यंत पोहचण्यासाठी संस्थेने गेल्या ३ वर्षांत कोणकोणते कृती कार्यक्रम आयोजित केले? सारथी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन तयार करण्याबाबत गेल्या आंदोलनाच्या वेळी निवेदन देण्यात आले होते, सारथी संस्थेची कॉलसेंटर व व्हॉट्स अप हेल्पलाईन सुरु झाली का? केव्हापर्यंत सुरु होईल? सारथी संस्थेचे वेबसाईट चे डोमेन शासकीय (www.sarthi.maharashtra.gov.in) असावे, याकरिता निवेदन देण्यात आले होते, त्यावर काय कार्यवाही करण्यात आली? परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकावे यासाठी संस्थेने काही कृती कार्यक्रम तयार केलेला आहे का?
सारथी संस्थेच्या सोशल माध्यमांमध्ये सारथी ची माहिती फेसबुक व युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून देण्यात येते. परंतु स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी टेलिग्राम वापरतात, संस्थेच्या अधिकृत माहितीकरीता ट्विटर चॅनेल असावे व आजच्या काळात लोकप्रिय असे इंन्टाग्राम या प्लॅटफॉर्म वर संस्थेचे अधिकृत खाते चालू आहे का?

सारथी संस्थेच्या वतीने जे विद्यार्थी अधिकारी पदावर म्हणून नियुक्त झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी गेल्या २ वर्षांत किती सत्कार कार्यक्रम घेण्यात आले? त्यापैकी अधिकाऱ्यांना संस्थेने पुढील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित केले का?
१० वी आणि १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावे? याकरिता मार्गदर्शन शिबीरांचे संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात यावे. सारथी मुख्यालय इमारतीचे कामकाज ३१ मार्च २०२३ रोजी पुर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही संस्थेच्या इमारतीचे कामकाज अपुर्ण आहे आणि याच गतीने काम चालू राहिले तर पुढील वर्षभर इमारतीचे बांधकाम पुर्ण होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर इमारतीचे काम उरकावे.
सारथी संस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने आम्ही केलेली आहे. याबाबत अनेक बैठका कधी सह्याद्री अतिथीगृह, मंत्रालय तर कधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या आहेत. या बैठकांनंतर अनेक शासन आदेश निघाले, मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न अद्याप देखील प्रलंबित आहेत. शासन नवनवीन शासन आदेश काढत असते, मात्र त्या आधी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची देखील अंमलबजावणी व्हावी.


यावेळी स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे, गणेश सोनवणे, राजू फाले, विनोद परांडे, विजय जरे, स्वाती बेंद्रे, द्वारकेश जाधव, किशोर दाताळ, किशोर तेलंग, निखील तांबे, अजित घोटकुले व सारथी संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

See also  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मुळशी परिसरातील मतदान केंद्रांना भेट