शासनाकडून दिंड्याना मिळणा-या २० हजार रुपये अनुदानाचे दिंडी प्रमुखांनी केले स्वागत

अकलूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत आता राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख व संस्थांचे अध्यक्ष यांना संधी मिळणार असल्याची माहिती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे यांनी दिली . दरम्यान शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणा-या सुमारे १५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचे राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केले.


मुंबई मंत्रालयात शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख  ह भ प अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुख व संस्थांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . यावेळी मुख्यमंत्र्यांकडे महापुजेची मागणी करण्यात आली .
हरणे म्हणाले , पुर्वी श्री विठ्ठलाच्या पहाटेच्या महापुजेला राज्यातील मानाच्या पालखी सोहळा प्रमुख व संस्थान अध्यक्षांना बोलाविले जायचे . पुढे   ती पध्दत बंद करण्यात आली . राज्यातील कानाकोप-यातून शेकडो किलोमिटरची पायपीट करुन लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात या वारक-यांना विठुरायाचे साधे दर्शन सुध्दा होत नाही . या वारक-यांचे प्रतिनीधी म्हणून शासनाने राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख व संस्थान अध्यक्ष यांना महापुजेला निमंत्रीत करावे , आषाढी वारी  पालखी सोहळे व शासन यांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमावा , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सल्लागार मंडळात संस्थान अध्यक्ष व सोहळा प्रमुखांचा समावेश करावा आदी  मागण्या  त्यांनी केल्या .


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारत्मकता दर्शविली असून आषाढी वारी वारक-यांच्या दृष्टीने सुरक्षित व आनंददायी होण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगितले .

See also  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले