पुणे : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने उमेदवारी दिली आहे.
पुण्यातील पक्ष कार्यालयात एबी फॉर्म देण्यअगोदर माजी महापौर दशरथ पाटील यांनी पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी पाटील म्हणाले की, कोल्हापूर आणि नाशिकचं जवळच नात आहे. स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व हे या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळचं उत्तर महाराष्ट्रामधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज आम्ही वीस जागा जाहीर करत आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीत त्यांच्या त्यांचा वाद सुरु आहे, त्याकडे आमचं लक्ष नाही. आम्ही केवळ महाराष्ट्राला परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून चांगला पर्याय कसा देता येईल, आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष केंद्रित करत आहोत. अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही विस्थापितांना ही ताकद देणार आहोत.
जरांगे पाटील आमचं उद्दिष्ट एकच आहे. जरांगे पाटील यांना मी पूर्वीच सांगितलं होतं ही तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे., असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दशरथ पाटील हे नाशिकच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहेत. २००२ ते २००५ या काळात शिवसेनेचे २ नगरसेवक असताना त्यांनी नाशिकचे महापौर म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून १४ जिल्ह्यांचे प्रभारी, चिटणीस आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी केली. २००४ साली शिवसेना-भाजपच्या तिकिटावर नाशिक लोकसभा निवडणूक लढवली होती. केवळ सात हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारा लागला होता. त्यांचं स्थानिक राजकारणातील महत्त्व कायम असल्याने त्याचा चांगला फायदा हा महाराष्ट स्वराज्य पक्षाला होणार आहे.