कवी जयंत भिडे यांच्या साहित्य सेवेचा सन्मान

पुणे : काव्य क्षेत्रातील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कवी आणि गीतकार जयंत भिडे यांचा रंगतसंगत प्रतिष्ठान आणि काव्यशिल्प संस्था यांच्यावतीने रविवारी सन्मान करण्यात आला.

रंगतसंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.प्रमोद आडकर, कार्यकारी अध्यक्ष मैथिली आडकर, काव्यशिल्पच्या अध्यक्ष स्वाती यादव, सचिव राजश्री सोले उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन कवी जयंत भिडे यांना सन्मानित करण्यात आले.

आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीचा परामर्श जयंत भिडे यांनी मनोगत व्यक्त करताना घेतला. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे नेमके प्रतिबिंब कवितेत उमटायला हवे. समाजाला दिशा देण्याचे कामही कवी आणि गीतकार करू शकतात. ही जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भिडे यांनी केले.

विषयाशी एकरूप झालो तर, आपल्याला कविता सहज सुचत जाते, असे सांगताना त्यांनी, त्यांना ‘रामधून’ सुचली, तेव्हाचा किस्सा सांगितला.
प्रभा सोनवणे यांनी भिडे यांचा उपस्थितांना परिचय करून दिला. राधिका दाते यांनी सूत्रसंचालन केले. सन्मान सोहळ्यानंतर कवी संमेलन झाले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मनिषा माने यांनी केले.

See also  शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती