शशिकांत पाटोळे
नवी दिल्ली : दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. तर, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित संरक्षण अधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका पार पडल्या. पंतप्रधान मोदी यांनी देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. भारत सरकारने आपली भूमिका ठरवली असून पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर बिथरलेल्या पाकिस्नाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानकडून डागण्यात आलेले ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले. पाकिस्तानच्या सगळ्या प्रकारच्या आगळीकीला भारतीय सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
भारताचं पाकिस्तानबाबत काय ठरलं?
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, भारताने पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे . “तणाव लवकरात लवकर कमी करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे भारताने सुनावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तरी पाकिस्तानने “शहाणपणाचा मार्ग” निवडावा आणि त्यांच्या देशातून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करावं, अशी भूमिका भारताने घेतली आहे. “दहशतवाद ही या सगळ्या संघर्षाची मुळं आहेत आणि ती मुळासकट उपटणं हेच खरे समाधान आहे,” असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.
भारताने केलेली कारवाई ही दहशतवाद्यांविरोधात होती, कोणत्याही पाकिस्तानच्या लष्करी तळावर किंवा सामान्य नागरिकांवर नव्हे, हे देखील यावेळी ठामपणे सांगण्यात आलं. भारतीय लष्कराने अत्यंत अचूक आणि टप्प्याटप्प्याने योजना आखत ही कारवाई केली असून, यात वापरलेली तंत्रज्ञानही पूर्णतः देशी (indigenous) आहे, असं सरकारच्या सूत्रांनी सांगितलं.
*पाकिस्तानकडूनच युद्धजन्य परिस्थिती*
दरम्यान, पाकिस्तानमधील काही मंत्री आणि नेत्यांकडून सुरू असलेली भीती आणि अफवांची लाट, ही केवळ स्थानिक जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारताकडून आली आहे. “पाकिस्तान सरकार आणि लष्कर आता प्रचंड दबावाखाली आहेत असल्याचे भारताचे मत आहे. पाकिस्तानमध्ये महागाई, बेरोजगारी, PTI समर्थकांचा विरोध, अशा वेगवेगळ्या कारणांनी सगळीकडे असंतोष आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष हटवण्यासाठी आणि रोष कमी करण्यासाठी पाकिस्तानी सत्ताधारी, लष्कराकडून युद्धजन्य वातावरण तयार करत आहेत,” असा आरोप भारताकडून करण्यात आला आहे.
*ते दहशतवादी सोपवा, भारताची मागणी…*
भारताने पाकिस्तानकडून हाफिज सईद, मसूद अझहर आणि रऊफ अझगर यांचं तात्काळ भारताकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली आहे. “दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करा, ‘प्रॉक्सी वॉर’ थांबवा आणि शेजारधर्म पाळा,” असा सक्त इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या गंभीर आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय कर्जाचा डोंगर, आणि राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला देश सावरण्यावर लक्ष केंद्रीत करावं, अशी भारताची भूमिका आहे.