‘वारकरी संख्येचा अंदाज घेऊन चोख नियोजन करा’ – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे (प्रतिनिधी) :  महाराष्ट्राच्या वारकरी, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा शतकानुशतके अविभाज्य भाग असणारे पालखी सोहळे येत्या शुक्रवारी शहरात दाखल होत असून परंपरेनुसार पालख्यांचा दोन दिवस मुक्काम पुण्यात असणार आहे. यावेळी वारकऱ्यांची संख्या आणि पावसाची शक्यता गृहित धरूनच सर्व चोख नियोजन प्रशासनाने करावे. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गांची पाहणीदरम्यान प्रशासनाला दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी चौकातून पालखी मार्गांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करत फुलेनगर विसावा, संगमवाडी चौक, पाटील ईस्टेट चौक, सीओईपी परिसर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर आणि भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भेट देत पाहणी केली. प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा, सुरक्षेसाठीचा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्यासह पालखी मार्गावर असेलेले स्थानिक नगरसेवक, भाजपासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पाहणीदरम्यान वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आढावा घेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच स्वच्छतेची व्यवस्था चोख ठेवावी. शिवाय आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेबाबतही काही महत्वाच्या मुद्द्यांवर सूचना केल्या’.

‘शुक्रवार आणि शनिवारी शहरातील पार्किंगची व्यवस्था, वाहतूक करण्यात येणारे बदल, पालखी मार्गांची आणि रविवारी प्रस्थान मार्गावरील वाहतूक व्यवस्था, याबाबत सखोल माहिती घेतली. कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यंदाच्या वारीच्या नियोजनाच्या केंद्रस्थानी संभाव्य पाऊस ठेवा असे सूचित केले. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशीही संपर्क ठेवा’, अशीही सूचना केली.

See also  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिन साजरा