पुणे : त्रिभाषा सूत्र पहिलीपासून राबवू नये अशी आग्रही मागणी आम आदमी पार्टीने केली होती परंतु त्यानंतरही आता पहिली पासूनच त्रिभाषेचा आदेश मंगळवारी संध्याकाळी काढण्यात आला असून मराठी माणसासाठी ‘ नाईलाज को क्या इलाज ‘ म्हणत हिंदी स्वीकारावी लागणार आहे. आम आदमी पार्टी व आप पालक युनियन ने याचा तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्र अवलंबणे गरजेचे असले तरी ते पहिलीपासून लागू करण्याबाबत कोणताही आग्रह यात नाही. असे असतानाही महाराष्ट्रातील युती सरकारने यापूर्वीच हिंदी भाषा ही सक्तीची असल्याचा आदेश काढला आता त्यामधील ‘ अनिवार्य’ हा शब्द काढून ‘ सर्वसाधारणपणे ‘ हिंदी ही तृतीय भाषा असेल असा शब्दछल केला आहे. शिक्षण मंत्री भुसे यांनी मध्यंतरी शैक्षणिक तज्ञ आणि आप व इतर राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करणार नाही असे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात आदेश काढताना मात्र फसवणूक केली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील प्रशासकीय लॉबी आणि भाजपमधील लोटांगण घालणारे उत्तर भारतीय हिंदी धार्जिणे नेते कारणीभूत आहेत. हे गायपट्ट्याचे महाराष्ट्रावर कब्जा मिळवायचे षडयंत्र आहे असा आरोप आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.