बाणेर : बाणेर स्मशानभूमी रस्ता येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठत असून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर 24 तास पाणी राहत असल्याने वाहन चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणी असल्याने पादचारी नागरिकांना या रस्त्यावरून चालता येत नाही.
बाणेर गावठाण ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळी गटारांची स्वच्छता करण्यात आलेली नाही यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. यात भर म्हणजे या परिसरात खाजगी बांधकाम व्यवसायिकांच्या बांधकामावरील पाणी पावसाळी गटारात सोडण्यात आल्याने मागील दोन महिन्यापासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे.
रस्त्यावर पाणी साठल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून या परिसरात टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन बदलण्याची मागणी देखील केली जात आहे. मे महिन्यामध्ये पावसाळी गटाराची साईज वाढवण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप रस्त्यावरच पडून असल्यामुळे याचा देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्मशान भूमी कडे मयत झाल्यानंतर नागरिकांना जाण्यासाठी सुव्यवस्थेत रस्ता नसल्याने अनेकदा मार्ग बदलावा लागत आहे.
या परिसरातील पावसाळी गटारांच्या चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी तसेच रस्त्यावर टाकण्यात आलेले पाईप तातडीने काढण्यात यावे. तसेच पावसाळी चेंबर मध्ये खाजगी बांधकाम व्यवसायिकांकडून सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी जयसिंग मुरकुटे यांनी केली आहे.