बालेवाडी : बालेवाडी परिसरात भर पावसात रस्त्यावर पाणी असताना पालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात येत असल्याने पाण्यात डांबर टाकण्याचा प्रकारामुळे रस्ते निकृष्ट दुरुस्त होणार असल्याचे दिसून येत आहे. पालिका दुरुस्तीच्या नावाखाली पाण्यात डांबर टाकून डांबरीकरणा ऐवजी डांबरटपणा करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे?
बाणेर बालेवाडी औंध पाषाण परिसरामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. पुणे महानगरपालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जात असून रस्त्याच्या खड्ड्यांमधील पाणी बाजूला न करताच डांबर जात असल्याने असे डांबरीकरण योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावर साफसफाई केली नाही, पातळ डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे बेस तयार झालेला नाही. काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यावर डांबराचा पातळ थर टाकण्यात आला आहे. यामुळे सदर ठिकाणचे डांबरीकरण हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रशासनाकडून काम दाखवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पथ विभाग अधिकारी योगिता भांबरे यांनी सांगितले की, रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, यासाठी पॅचवर्क करण्यात आले आहे. सदर काम हे दुरुस्ती चे आहे. पावसात देखील दुरुस्तीची कामे करावी लागतात.