पुणे : येथील चंदन नगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींनीनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता “ या घटनेबद्दल नाराजगी व खेद व्यक्त करत सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबाच्या बाबत अशा प्रकारची घटना होणे अत्यंत वाईट आहे व अशा प्रकारची कृती करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.” असे स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
दिनांक 26 जुलै रोजी रात्री उशिरा चंदन नगर येथे शमशाद शेख यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दल , विश्व हिंदू परिषद व इतर सकल हिंदू समाज वडगाव शेरी च्या नावाखाली स्वतःला हिंदुत्वादी म्हणवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी सदर कुटुंबीयांना रोहिंग्या, बांगलादेशी असे संबोधून त्यांची अवहेलना केली होती. यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित कुटुंबीयांनी नॅशनल कॉन्फरन्सचे राहुल डंबाळे यांच्या उपस्थितीत आज पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील यांचे अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी मानवी हक्क कार्यकर्ते अँड. असीम सरोदे, शहाबुद्दीन शेख, वसिम सय्य्द, अफजल खान, अझहर खान, मुफ्ती शाहीद , ॲड. तौसिफ शेख, आतिफ शेख, जावेद शेख, फिरोज खान, करिम शेख, समिर शेख , अस्लम सय्यद , सुफीयान तांबोळी , शारुख शेख , सादमान खान, साहील खान , इम्तियाज खान , हुसैन शेख. इत्यादी लोक सहभागी होते
पुणे शहरांमध्ये अशा प्रकारची कोणतीही धार्मिक विद्वेशाची कृती खपवून घेतली जाणार नाही. कायद्याप्रमाणे जे वागणार नाहीत व चुकीची माहिती व दिशाभूल देणारी माहिती देऊन स्वतःचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतील अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरांमध्ये कोणीही धार्मिक भीतीच्या छायेत राहू नये , समाजकंटकांवर कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत असा विश्वास यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिष्टमंडळाला दिला.
राहुल डंबाळे ( एनसीएम )- अलिकडच्या काळात पुणे शहरातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटनांमध्ये वाढ करून शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम त्याच त्या व्यक्तींकडून व संघटनांकडून केला जात असल्याने अशांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले. दरम्यान समाजकंटक व धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांच्या विरुद्ध या पुढील कालावधीमध्ये अधिक ताकतीने लढण्यात येणार असल्याचेही डंबाळे यांनी सांगितले.