महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह आदी विविध संघटनांचे पदधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, सामाजिक अन्यायाविरुद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवला, वंचित-शोषितांना न्याय मिळवून दिला. वंचित समाजाने शिक्षण घेतले पाहिजे, त्यांनी संघर्ष केला पाहिजे, त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांचे ऋण अनेक पिढ्या विसरु शकणार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित देशाची राज्यघटना जगातली सर्वात चांगली घटना मानली जाते. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले तरी आजही देशाला दिशा देण्याचे कार्य राज्यघटना करीत आहे. आगामी काळातही राज्यघटना आपल्यासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक राहील, असेही श्री. पाटील म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ व ताक बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

See also  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा