पुणे, दि. ३० जून : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत गुलाबो गॅंगच्या वतीने मंगळवारी भवानी पेठ येथील दत्त मंदिरातील श्रीराम दरबारात विशेष आरती व प्रार्थना करण्यात आली.
यावेळी प्रभू श्रीरामांच्या चरणी साकडे घालत कथित देणगी, सोने-चांदी, हिरे-जवाहिर, दागिने तसेच मंदिराला अर्पण करण्यात आल्याचा दावा असलेल्या सोन्या-चांदीच्या विटांबाबत सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली.
गुलाबो गॅंगच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीराम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येऊन आपल्या श्रद्धेनुसार रोख रक्कम, सोने, चांदी, दागिने व इतर मौल्यवान वस्तू अर्पण करतात. त्यामुळे या सर्व कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषी कोणतेही असले तरी त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी रामभक्तांची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आरती व प्रार्थना कार्यक्रमास संजय बालगुडे, शोभा पणीकर, सोनिया ओवाळ, निकिता ताई, अशोक चव्हाण, बाळू चव्हाण यांच्यासह गुलाबो गॅंगचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















