रहाळकर राममंदिरात पुणे शहर काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप – माजी आमदार मोहन जोशी

पुणे :जय सियारामच्या जयघोषात आणि मंगलमयी उत्साही वातावरणात सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सोमवारी महाआरती, भजन केले आणि नंतर प्रसादाचे वाटप केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला भाविक वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीरामाचे भजन करण्यात आले, प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी आमदार रविंद्र धंगेकर, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, रोहित टिळक, शेखर कपोते, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, लता राजगुरु, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रविण करपे, स्वाती शिंदे, शानी नौशाद, नरेंद्र व्यवहारे, गौरव बोराडे, प्रथमेश आबनावे, चैतन्य पुरंदरे, रोहन सुरवसे, किशोर मारणे, अनिल आहेर आदी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच ऊदाहरण आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली,असे याप्रसंगी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.

श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणाऱ्याना रामरायानेच सदबुद्धी द्यावी अशी प्रार्थना सुद्धा या प्रसंगी रामरायाच्या चरणी करण्यात आली, असे मोहन जोशी म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही याचेही स्मरण मोहन जोशी यांनी करून दिले.

रहाळकर राम मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने मोहन जोशी, आ.रविंद्र धंगेकर, रोहित टिळक यांचा सत्कार करण्यात आला. महाआरतीचे नियोजन सुरेश कांबळे आणि गोरख पळसकर यांनी केले.

See also  महाराष्ट्रात २६ एप्रिल ते २५ मे या दरम्यान पाच टप्प्यांत निवडणूका, पुण्यात 13 मे ला मतदान.