पुणे : नागरिकांचे प्रश्न थेट उमेद्वारांसमोर एकाच मंचावर मांडण्यासाठी आणि त्यांची उत्तरं, आणि भूमिका समजून घेण्यासाठी परिवर्तन तर्फे जनसंसद कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रमासाठी काँग्रेसचे श्री रवींद्र धंगेकर, भाजपचे श्री मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे श्री वसंत मोरे या तीनही प्रमुख उमेदवारांकडून त्यांची उपस्थिती निश्चित केली गेली होती. परंतु श्री मोरे वगळता दोन्ही उमेदवारांनी आयत्या वेळी कार्यक्रमाला अनुपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. आणि नागरिकांना आपण उत्तरदायी आहोत असे ते मानत नसल्याचे निवडून येण्याआधीच दिसून आले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील उपस्थित उमेद्वारांपैकी वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि सैनिक समाज पक्षाचे निवृत्त कर्नल सुरेश पाटील या दोन उमेदवारांनी राष्ट्रीय आणि स्थानिक अशा दोन्ही विषयांवरच्या अनेक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमात अनेक नागरिक, अभ्यासक आणि सामाजिक संस्थांच्या सूचना एकत्र करून ‘परिवर्तनाचा जाहीरनामा’ अर्थात नागरिकांचा जाहीरनामा प्रकाशित केला गेला. आणि हा जाहीरनामा दोन्ही उमेदवारांना देण्यात आला. ‘निवडून आलो तर आणि दुर्दैवाने नाही आलो तरीही या विषयांवर आम्ही काम करत राहू’ असे आश्वासन श्री मोरे आणि नि. कर्नल पाटील या दोन्ही उमेदवारांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली नवघणे यांनी केले. नागरिकांचे प्रश्न विचारण्याचे काम इंद्रनील सदलगे आणि तन्मय कानिटकर यांनी केले. परिवर्तन अध्यक्ष अमृता नागटिळक यांनी समारोप केला. अनिकेत मुंदडा यांनी आभार प्रदर्शन केले.