खासदार सुप्रिया सुळे यांची सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : संसदेचे आजपासून पाच दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. उद्यापासून संसदेच कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. त्याआधी मागील ७५ वर्षात आलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवण्यात आला. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  सत्ताधारी पक्षातील खासदारांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा मुद्दा मांडला. माझे त्यांना पुर्णपणे समर्थन आहे. कारण पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे की, याची तातडीने चाैकशी करावी. या चाैकशीला आमचे पुर्ण समर्थन असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. आजची भाजपा पाहिली तर सर्वात जास्त सदस्य हे काँग्रेसमधून तिकडे गेलेले आहेत. तुम्ही साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी नेहमी म्हणत असतात. पण साठ वर्षात आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले खासदारच आज सत्ताधाऱ्यांकडे गेलेले आहेत.

आपला देश तरुणाईचा देश आहे. आज अनेक महिला खासदार आहेत. आणि महिला आरक्षणाचा विषयावर चर्चा होत आहे. पण सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणाले की, महिला आरक्षणाच्या बाबतीत अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्यांनी काय केले. मी सांगू इच्छिते की देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी या काँग्रेसच्या होत्या. संसदेत हे बिल मांडण्यात देखील आले होते. पण ते पास होऊ शकले नाही. तसेच देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या कार्यकाळात ते बील पास करण्यात आले होते. देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. आणि आपण नवीन संसदेत जात असताना पहिला निर्णय महिला आरक्षणाचा घेतल्यास आमचा त्याला पाठिंबा असेल.

See also  कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी३२ हजार ५५९ नामनिर्देशन प्राप्त