बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे एलाईट एम्पायर सोसायटी, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या “महावितरण – नागरिक संवाद” हा उपक्रम घेण्यात आला.नितीन थिटे – कार्यकारी अभियंता, महावितरण, उमेश करपे – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण आणि सोमनाथ पठाडे – सहाय्यक अभियंता, बाणेर कार्यालय यांनी बाणेर-बालेवाडी परिसरातील रहिवाशांशी संवाद साधला.
या बैठकीदरम्यान नितिन थिटे व उमेश करपे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या स्मार्ट मीटर, विजेचा लपंडाव , व्होल्टेजचा चढ-उतार, ऑनलाइन तक्रार निवारण, उपकरणांची नियमित देखभाल आणि बाणेर-बालेवाडीमधील पायाभूत सुविधांचे सुधारणेसंबंधी विविध मुद्द्यांना उत्तरे दिली.
थिटे यांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित होण्याचे मुख्य कारण स्थानिक स्तरावरील खोदकाम आणि सुरू असलेले मेट्रोचे काम आहे. त्यांनी नागरिकांना आपली उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी ELCB आणि RCB सारखी संरक्षक साधने वापरण्याचा सल्ला दिला. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांना तक्रारींची नियमित तपासणी करून ट्रान्सफॉर्मरची वेळेवर देखभाल करण्याच्या सूचना दिल्या.
करपे यांनी विविध हेल्पलाईन क्रमांक आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांसोबत शेअर केले. बालेवाडी फेडरेशन मार्फत नागरिकांचे प्रश्न एकत्र करून ते महावितरणला सादर करून त्यावर उपाययोजना करावी असेही ठरले.
सोमनाथ पठाडे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या स्थानिक पातळीवरील समस्या ऐकून घेतल्या आणि त्या शक्य तितक्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमात बाणेर-बालेवाडीतील विविध सोसायट्यांतील ७० पेक्षा अधिक रहिवाशांनी सहभाग नोंदवला.
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे यश चौधरी, आशिष कोटमकर, मोरेश्वर बालवडकर, दफेदार सिंग, रमेश रोकडे यांनी कार्यक्रम आयोजनाची पुढाकार घेतला, तर अदिती पायस,
विकास कामत, शकील सलाटी आणि सचिन पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.