पुणे, कोथरूड : रामनवमीच्या निमित्ताने कोथरूड येथील जीत मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुडुंब भरलेल्या मैदानात आणि सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.
या संमेलनात वक्ते गणेश शिंदे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी शैलीत निसर्ग, समाज आणि अर्थकारण या विविध विषयांना स्पर्श करत श्रोत्यांना भावनिक साद घातली. ऐतिहासिक दाखले देत त्यांनी सद्य परिस्थितीची सांगड घालत विचार मांडले. “आज सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असताना संतांचे विचारच मानवजातीला तारू शकतात,” असा आशय व्यक्त करत त्यांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले.
त्यांच्या भाषणादरम्यान कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी स्तब्ध शांतता, तर कधी श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. संपूर्ण वातावरण अक्षरशः भारावून गेले होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वतः उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत शिंदे यांच्या वक्तृत्वाचे मनापासून कौतुक केले. त्यानंतर ते शिंदे यांच्या जवळ जाऊन त्यांनी आपल्या हातातील घड्याळ त्यांच्या हातात बांधत विशेष सन्मान केला.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना गणेश शिंदे म्हणाले, “दादा, ही वेळ कायम लक्षात राहील.”
या प्रेरणादायी क्षणामुळे संमेलनातील उपस्थितांमध्ये उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
























