मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी -सुषमा अंधारे

पुणे : वारंवार असत्य आणि दिशाभूल करणारी मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी आहे. लोकशाही संपवण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षात फूट पाडली आहे. लोकशाहीत त्यांना विरोधक ठेवायचे नाही. तर दुसरीकडे नागरिक महागाईने त्रस्त आहेत. महिलांची असुरक्षितता वाढली आहे. तरुणांची वाढती बेरोजगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. मोदी सरकार गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. मोदींनी दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही, मग त्यांना पंतप्रधान कशासाठी करायचे आहे? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ दत्तवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, विकासाचा एकही मुद्दा भाजपाच्या हातात नाही. त्यामुळे ते हिंदू- मुस्लिम, जात सलोख्यात तेढ निर्माण करीत आहेत. मराठा-ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण केला जात आहे. गॅस, पेट्रोलचे दरवाढले आहेत. स्मार्टसिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे, हीच मोदींची गॅरंटी आहे का?

सुषमा अंधारे म्हणाल्या की,खोट्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भाजपच्या अन्यायाला गाडण्यासाठी सर्वसामान्यांचा चेहरा रविंद्र धंगेकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,  असे सांगून विकासाचे मुद्दे सांगून निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान भाजपाला यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, काँग्रेसचे जेष्ठ नेतेॲड. अभय छाजेड,माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, बाळासाहेब ओसवाल, किशोर रजपूत, सुरज लोखंडे, राहुल तुपेरे, राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन कदम, गणेश नलावडे, वैजिनाथ वाघमारे, मृणालिनी वाणी, स्वप्नील खडके, आपचे सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, मुबंईच्या माजी महापौर निर्मलाताई प्रभावळकर यांच्यासह मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

चंद्रकांत हंडोरे म्हणाले, रविंद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचा किल्ला ढासळून टाकला आहे. आता धंगेकर लोकसभेत विक्रमी मताने नक्की निवडून येणार. भाजपच्या भूलथापांना नागरिक बळी पडणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली. गॅसची दरवाढ झाली.  मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपची ही फक्त जुमलेबाजी होती. राज्यघटनेने मुलभूत अधिकार, समानता दिली. राज्यघटना दीपस्तंभा सारखी मार्गदर्शन करीत आहे. या सत्ताधाऱ्यांनी न्याय व्यवस्था धोक्यात आणली आहे असे ते यावेळी म्हणाले.