समाजात संवेदनशीलता, दातृत्वाची इच्छा निर्माण व्हावी – चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

पुणे : “दीपस्तंभ फाऊंडेशनने मनोबलच्या माध्यमातून दिव्यांग व अनाथ विदयार्थ्यांच्या उच्च करिअर साठी केलेले कार्य हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. दिव्यांग, वंचित घटकांसाठी विविध ठिकाणी अनेक लोक काम करत आहेत. दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्य सरकारी यंत्रणेलाही प्रेरणा देणारे आहे. दिव्यांगांसाठी राज्य सरकारकडूनही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, लवकरच राज्यात खास दिव्यांगांसाठीच्या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. समाजात संवेदनशीलता, दातृत्वाची इच्छा निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राविवारी दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल पुणे परिवारातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून  केंद्रातील अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव श्री. राजेश अग्रवाल ,पंजाब येथील अंधत्वावर मात करून आयएएस झालेले अजय अरोरा, हे तर मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे जिल्हा न्यायधीश महेंद्र महाजन, तसेच बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या सीएसआर समितीच्या प्रमुख शेफाली बजाज, दीपस्तंभ फाऊंडेशनचे मुख्य सल्लागार एम.व्ही.कोतवाल, दीपस्तंभ फाऊंडेशनचे ग्लोबल सदस्य अमित वाईकर, यजुर्वेंद्र महाजन हे उपस्थित होते.

दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सूत्रसंचालन प्रज्ञाचक्षू वामीका शर्मा, दिव्यांग ऋषिकेश पवार, प्रणिता काबरा यांनी केले. प्रज्ञाचक्षू विद्यार्थीनी नाझनिन शेख हिने गायलेल्या ‘’हीच आमची प्रार्थना’’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली तर दोन्ही हात नसलेल्या माउली अडकूरने हार्मोनियम वर “सारे जहाँ से अच्छा” या देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. आभार अमित वाईकर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व दिव्यांग विदयार्थ्यानी मिळून केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजचा हा कार्यक्रम इतका भावस्पर्शी झाला आहे, की मी भारावून गेलो आहे.. एखादा अवयव नसल्याने काहीच बिघडत नाही, जे आपल्या कडे आहे त्या द्वारे काय कर्तुत्व गाजवता येत हे दाखवणारा हा सोहळा आहे. सरकारी कामात प्रेरणा जागृत करण्याची, संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांचे सहकार्य व सहभाग महत्वाचा आहे. समाजामध्ये देण्याची मोठी ताकद आहे. आपल्याला केवळ देण्याची इच्छा निर्माण करायला हवी.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, “दिव्यांगाच्या करिअर व शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी देशात दीपस्तंभ मनोबल सारख्या संस्थाची आवश्यकता आहे. मनातील उमेद, जिद्द कधीच हरू नका. आपल्यातील इच्छाशक्ती, करुणाभाव आणि व्यावसायिकता आपल्याला यशाकडे घेऊन जाते.”

अजय अरोरा म्हणाले, “सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या दीपस्तंभ मनोबल मधील सर्व प्रकारचे दिव्यांग, अनाथ ट्रांसजेडर, आदिवासी या मुलांचे हे यश संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सातत्याने शिकण्याची भूक, अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वृत्ती आणि बदलांचा दुवा बनण्याची मानसिकता जोपासत रहा. तुमचे यश केवळ तुमचे नाही, तर समाजाचे आहे. येणारा काळ नव्या अडचणी घेऊन येईल. त्यामुळे आत्मविश्वासाने काम करा.”

प्रास्ताविकात यजुर्वेंद्र महाजन म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना समाजात सर्वात जास्त गरज आहे, अश्या दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडावीत या उद्देशाने दीपस्तंभची स्थापन झाली. लोकसहभातून जळगाव व पुणे येथे देशभरातल्या ४०० विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. त्यांना प्रेम, आनंद, आत्मसन्मान मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून ते आत्मनिर्भर व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रामाणिक, संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि धाडसी व्यक्ती म्हणून तुमची जडणघडण झाली पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करा असा सल्लाही त्यांनी या वेळी विदयार्थ्याना दिला ”

मला मिळालेल्या यशात दीपस्तभंचा मोठा वाटा आहे, अनेक अडचणीच्या प्रसंगी माझं मनोबल वाढविण्याचे काम दीपस्तंभने केले आहे अश्या भावना फरहान जमादार याने व्यक्त केल्या. अपयशाची भीती हि सर्वात मोठी भीती आपल्यात असते जी आपला आत्मविश्वास कमी करत असते, पण तो आत्मविश्वास दीपस्तंभने माझ्यात निर्माण केला अश्या भावना आयुष्य अग्रवाल याने व्यक्त केल्या. आमच्या सारख्या तळागाळातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आणि आमच्यात विश्वास पेरण्याचा काम दीपस्तंभने केलं आहे अश्या भावना प्रितेश बाविस्कर याने व्यक्त केल्या. न मागताही देणारे म्हणजे मनोबल. दात्यांमुळे आमची पाऊले उचलली जात आहेत पण तो रस्ता जोडला आहे तो मनोबलने अश्या भावना दीक्षा दिंडे हिने व्यक्त केल्या. आयुष्यात अपयश येण गरजेचं आहे, त्यामुळेच आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते, या काळात मन शांत ठेवून सतत अभ्यास करणे गरजेचे आहे, अश्या भावना प्रियांका मोहिते हिने व्यक्त केल्या. अनाथ असलेल्या माझ्या सारख्या अनेकांना खऱ्या अर्थाने परिवाराची गरज असते जो परिवार आमच्या पाठीशी भक्कम उभा राहील आणि दीपस्तंभ माझा परिवार आहे जो माझ्या पाठीशी उभा आहे. मी समाजाची ऋणी आहे कि मला दीपस्तंभ सारखा परिवार मिळाला अश्या भावना सतीश कल्याणी याने व्यक्त केल्या. बजाज फिनसर्वचे सीएसआर प्रमुख कुरुष हिरानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

रेल्वे अपघातात दोन्ही पाय व एक हात गमावलेल्या सुरज तिवारी याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. दोन्ही पाय नसलेल्या आणि अनाथ असलेल्या राज या विदयार्थ्याची जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश परिक्षेतुन निवड झाली. अनाथ असलेल्या आणि दोन्ही डोळ्यांनी १०० % अंध असणाऱ्या मोहिनी शर्माची बँक प्रोबेशनरी अधिकारी पदी निवड झाली. दीपस्तंभ मनोबलच्या या विदयार्थ्यांचा जिवन प्रवास ऐकतांना सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले


दीपस्तंभ विशेष सन्मान आणि गुणवंतांचा शुभेच्छा आणि कौतुक सोहळा


यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन करणारे फरहान जमादार (UPSC Air 191), आयुष अग्रवाल (UPSC Air 341), श्रवण देशमुख (UPSC Air 976), प्रितेश बाविस्कर(UPSC Air 767), सुरेश बोरकर (UPSC Air 658), प्रियांका मोहिते (UPSC Air 595), विजय साळवी (आरबीआय ), सुजित शिंदे ( शिक्षणाधिकारी वर्ग १), नारायण इंगळे(आरएफओ), दीक्षा दिंडे (युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, लंडन), रवीना इंगोले (आयआयटी मुंबई ), पंकज गिरासे (TISS), राज महाजन ( जे जे स्कुल ऑफ आर्ट,मुंबई), प्रणित गुप्ता (आयआयएम), सुरज तिवारी (indian information service ), अनुराधा सोळुंके (wheelchair fencing worldcup ), राजेश पिल्ले (Tata consultancies), अजय पठाळे (बँक पिओ), मोहिनी शर्मा (बँक पिओ), वामीका शर्मा (बँक पिओ), वैष्णवी गोळे (प्रशासकीय अधिकारी, युनाइटेड इन्शुरन्स कंपनी), प्रियांका गायकवाड (बँक पिओ), दीपक गजरे (बँक पिओ), प्रशांत केदारे (बँक पिओ), शुभम गुप्ता (एसएससी), श्रीहरी हगारे (बँक पिओ ), ऋषिकेश आढाव (आरबीआय अधिकारी), मेहबूब पिंजारी (एसएससी ), गजाजन औटकर ( एसएससी), शशिकांत कुलट ( EPFO), संतोष भोसले (STI ), प्रतीक शिंदे ( एसएससी), विशाल जगताप ( STI), विकास राठोड ( ASO), ऋषिकेश पवार (कर सहाय्यक ), अमोल शिंदे (PSI ), सतीश बऱ्हाटे (STI ), ज्ञानेश्वर चांगण (ITI प्रशिक्षक ), सूर्यकांत पाटील (अधीक्षक, वैद्यकीय विभाग ), सतीश कल्याणी ( psi), पूजा शर्मा ( Nursing), सिद्धी दळवी ( SSC ९४%), सुमन सरदार (महानगरपालिका पुणे ), सुनील खेडकर (सहकार अधिकारी), चैताली पातावार (set exam ) यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. सोबतच दीपस्तंभ मनोबल परिवाराचे हितचिंतक लुंकड कंस्ट्रक्शनचे रवींद्र लुंकड, अनिल कुलकर्णी, बॉशचे आदित्य आढवी, मॅग्नाचे बेल्लेकर, गंगाधर पाटील यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता पूर्वक सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

See also  महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना