महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन

पुणे : महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात आपल्या लेकींवर रोज अत्याचार होत असताना, सत्ताधारी मात्र याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टीने बघत आहेत. ज्या गृह विभागाकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी असते तेच गृह विभाग अत्याचारांना न थांबवता आंदोलकांना अटक करत असेल .
महिलांवरील या अत्याचारांचा आज महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.


या आंदोलनात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार , ज्येष्ठ नेते मोहन जोशी, श्री. बाळासाहेब शिवरकर, खा. सुप्रिया सुळे, श्री. महादेव बाबर, आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, रमेश बागवे, दीप्ती चौधरी, आबा बागुल, अभय छाजेड यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले,  बदलापूरला दोन बालिकांच्यावर जो अत्याचार झाला त्याने सबंध देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला. आज ज्या राज्यकर्त्यांवर मुली- बाळींच्या, स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांना आपल्या कर्तव्याची जाण राहिलेली नाही. त्याउलट आपण बघितलं की, बदलापूरचा प्रकार झाला त्याचा सर्वत्र निषेध होतोय पण त्याच कालखंडामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जात नाही कि जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी भगिनींवर अत्याचार झाल्याची बातमी ही दुर्दैवाने तुम्हा-आम्हाला वाचायला मिळते.

हे राज्य शिवछत्रपतींचे राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या काळात रांझ्याच्या पाटलांनी एका भगिनीवर अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांकडे गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय कलम करण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडतंय त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे, संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचे दुःख होते की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एक गोष्ट सांगताहेत की, बदलापूरच्या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणताहेत. मुली- बाळांच्या अत्याचाराविरोधात कोणी आवाज उठवला त्याला राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत? भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे? याची प्रचिती महाराष्ट्राला आली. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही आणि मी केला पाहिजे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली
मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अत्याचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा मोहल्ला, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याविरोधात आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही, महिलांचा सन्मान राखीन आणि या पुण्यनगरीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करीन.

यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.