औंध : औंध येथील परिहार चौकाच्या जवळ पोलीस मध्यवर्ती मोटार परिवहन कर्मशाळे समोरील पादचारी मार्गावर वाकलेले पत्रे व राडाराडा यामुळे नागरिकांना पादचारी मार्गावरून चालणे कठीण झाले आहे.
परिहार चौकातील पादचारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात अडथळे असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पादचारी मार्गावर लागणारी वाहने, पादचारी मार्गावर कंपाऊंडचे वाकलेले पत्रे धोकादायक असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्ता दुरुस्तीसाठी टाकण्यात आलेले मटेरियल यामुळे नागरिकांना पादचारी मार्ग सोडून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.
वेगाने वळणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी पादचारी मार्गावर निर्माण झालेले अडथळे तातडीने काढण्यात यावेत व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.