खडकवासलाः आधार कार्ड नसल्यामुळे खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकाचा मृतदेह 14 तास पडून राहिला. शासन प्रशासनाला शरम आणणाऱ्या संतापजनक घटनेने शासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दत्ता बबन जाधव वय 65 या कातकरी नागरिकाचा मंगळवारी (25 मार्च) रात्री मृत्यू झाला होता. जगण्याने छळले होते, मरणाने पण नाही केली सुटका अशी परिस्थिती या समाजातील.
कातकरी वस्तीत राहणारे दत्ता जाधव यांच्या मृत्यूनंतर
सकाळी नातेवाईक जमले, परंतु मृत्यूचा दाखला नसल्याने अंत्यसंस्काराचे सामान मिळेना. आधार कार्ड असेल तर आम्ही दाखला देऊ असे खडकवासला येथील डॉक्टर म्हणू लागले. आधारकार्ड नसल्याने मयताचे नातेवाईक हतबल झाले होते. खडकवासला येथील शांताराम मते, विजय मते, सौरभ मते या नागरिकांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्याशी सरपंच सौरभ मते यांनी संपर्क साधल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड यांनी पथकासह कातकरी वस्तीवर दाखल झाले. तहसीलदार किरण सुरवसे यांच्या सूचनेनुसार खडकवासल्याचे मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ, तलाठी रवी फणसे यांनी पंचनामा केल्यावर अखेर अंत्यसंस्कार पार पडला.
किरण सुरवसे, तहसीलदार हवेली–
आदिवासी कातकरी समाजातील नागरिक कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. या नागरिकांसाठी शासनातर्फे वेळोवेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते. अशी आवश्यक कागदपत्रे या नागरिकांकडून जपणूक करून ठेवली जात नाही म्हणून स्थानिक पातळीवरील महसूल अधिकाऱ्यांना या कागदपत्रांची जपणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांकडे वयाचा व जातीचा पुरावा नसला तरी आपण शिबीर घेऊन या कागदपत्रांची पूर्तता करत असतो. अशी कागदपत्रे नसलेल्या नागरिकांनाही आपण शिबिरातून ती उपलब्ध करून देणार आहे.
घर ताज्या बातम्या आधारकार्ड नसल्याने अंत्यविधीचे सामान मिळेना, अंत्यसंस्कारा विना मृतदेह 14 तास पडून