सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे येत्या दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि.१४ : सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६६.३६ हेक्टर क्षेत्रा व्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून व्हिजिबल सर्वे करण्यात येईल. तसेच याठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, सुहास बाबर, एमएडीसी च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती   पांडे, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, उपसचिव (विमान चालन) हेमंत डांगे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, मुख्य अभियंता कालिदास भांडेकर उपस्थित होते तर सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबल सर्वे लवकरच करण्यात येईल. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची याठिकाणी ६६.३६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्रा व्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे. यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून घ्यावा असे आदेश मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.

See also  डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज