आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे भारताची सायकल राजधानी बनणार अशी घोषणा करणे म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाणं – प्रशांत कांबळे

पुणे : पुणे शहर आज वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अर्धवट डीपी रोड, आणि अतिक्रमणामुळे त्रस्त आहे. नागरिकांना रोज तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं. अशा वेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे भारताची सायकल राजधानी बनणार अशी घोषणा करणे म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाणं आहे.

महापालिकेने आधी शहरातील रस्ते सुटसुटीत, अतिक्रमणमुक्त, नागरिक चालण्यासाठी फुटपाथ चालण्यायोग्य बनवावेत. अनेक डीपी रोड आजही पूर्ण झालेले नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर बांधकामांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. हे दूर न करता नव्या घोषणा करणे म्हणजे पुणेकरांच्या बुद्धीशी खेळ करणं आहे.

आधी देखील सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रयोग करण्यात आले, पण त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत झाला. हा पैसा म्हणजे पुणेकरांच्या घामाचा पैसा जो शासनाने आणि महापालिकेने या आधी वाया घालवला आहे.

आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रशांत कांबळे यांनी या घोषणेला तीव्र विरोध दर्शविला आहे. आमचा सायकल ट्रॅकला विरोध नाही, पण त्याआधी पुणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांनी संयुक्तपणे रस्त्यांवरील गर्दी कमी करण्याचा आणि पीएमपीएमएलचा दर्जा सुधारण्याचा ठोस प्रयत्न करावा. नागरिकांना शिस्तबद्ध वाहतूक, स्वच्छ रस्ते आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक हवी आहे केवळ घोषणाबाजी नव्हे.

आज पुणेकरांचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे.रस्ते तयार नाहीत, ट्रॅफिक नियंत्रण नाही, मग सायकल राजधानी कशी बनवणार? पुणेकरांचा पैसा पुन्हा वाया घालवायचा का? पुणे महानगरपालिका आणि प्रशासनाने आधी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे लक्ष द्यावे. वाहतूक व्यवस्थापन, डीपी रोड पूर्ण करणे आणि अतिक्रमण हटविणे या गोष्टींवर काम केल्याशिवाय सायकल ट्रॅकची नवी घोषणा म्हणजे केवळ दिखाऊपणा आणि जनतेची दिशाभूल आहे.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांनाच निवडून आणणार; खडकी परिसरातील नागरिकांचा निर्धार