नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक

मुंबई ( प्रतिनिधी) : कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर असलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजाने दिलेले ॲडव्हान्सेस ,बाजार समितीमधील सौदे, वाहतूक व्यवस्था व सुविधा यासह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आज नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

आंबा बागायतदार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी पिकावर ॲडव्हान्सेस दिलेले आहेत. सदर ॲडव्हॅान्स दिलेल्या रक्कमेवर १८ ते २४ टक्के व्याज आकारणी केली जात आहे. यावर्षी ९० टक्के आंबा उत्पादन घटल्याने व आंबा बागायतदार यांनी मोठ्या प्रमाणात बागेवर खते , किटकनाशके , मजूरी खर्च झाल्याने घेतलेल्या ॲडव्हान्सेसची व्याजासह परतावा करणे अशक्य झाले आहे.

यावर्षी कोकणातील आंबा उत्पादन ९० टक्के घटले असताना कर्नाटक , तमिळनाडू , केरळ व गुजरात मधून येणारा आंबा हा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जावू लागला आहे. कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटूनही दर पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. कोकणचा हापूस म्हणून परराज्यातून आलेला आंबा संपुर्ण राज्यभर विकला गेल्याने आंब्याचे दर पडू लागले आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावेळी व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित व्याजाची रक्कम न मागता ॲडव्हान्स रक्कम वसूलीस सहकार्य करण्याचे ठरविले. याबरोबरच कोकणातून येणारा आंबा रत्नागिरी , सिंधुदुर्ग अशा पध्दतीने जिल्हानिहाय वर्गवारी करण्याचे ठरले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय किती आंबा बाजार समितीत दाखल झाला याची माहिती दैनंदिन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी अथवा देवगड हापूस म्हणून बोगस आंब्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बागायतदार व व्यापाऱ्यांनीही केली.

या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरदकुमार झरे , स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर , कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग , रायगड व पालघर जिल्ह्यांतील बागायतदार, एपीएमसी मार्केटमधील प्रमुख व्यापारी आणि बाजार समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे