पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे पुणे ट्रॅफिक परिषदेचे आयोजन संपन्न

पुणे: पुण्यातील गंभीर बनत चाललेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस दल ‘तंत्रज्ञान, तज्ज्ञ सल्लागार आणि नागरिकांचे सहकार्य व सूचना’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणार आहे. शहरात लवकरच ५०० कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कॅमेरे बसवले जाणार असून, मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाईल. केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी शनिवारी केले.

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो व बससेवा, पार्किंगची समस्या तसेच रस्ते सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या वतीने ‘पुणे ट्रॅफिक परिषद’ शनिवारी पत्रकार संघात घेण्यात आली. अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, शहर वाहतूक उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पीएमपीएमएलच्या जॉईन्ट एमडी एलिस पोरे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, आरटीओ चे अधिकारी साखरे, पुणे मेट्रोचे अधिकारी मिहीर कुलकर्णी, हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल सावंत, वाहतूक अभ्यासक व ‘सकाळ’चे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, नगरसेवक रफिक शेख, काँग्रेसचे गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे आदी उपस्थित होते.

मनोज पाटील म्हणाले, पुण्याची वाहतूक कोंडी ही आता केवळ रस्त्यांची समस्या उरलेली नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानसिक तणावाशी जोडली गेली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक पुणेकराच्या आयुष्यातील सरासरी दोन वर्षे केवळ रस्त्यावर वाया जात आहेत. पुणे शहरात लवकरच ५०० ‘एआय’ कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट आणि स्वयंचलित दंडात्मक कारवाई करतील. वाहतुकीचे स्वयंचलित नियमन करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) चा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतूक शाखेने तयार केला असून, त्याचा सविस्तर अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुंबईत ज्याप्रमाणे अत्याधुनिक ‘ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे संपूर्ण शहरातील वाहतुकीचे एकात्मिक नियंत्रण केले जाते, तशीच यंत्रणा पुण्यातही कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

See also  'दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

वाहतूक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ‘ट्रॅफिक व्ह्यूअर ॲप’ चा प्रभावी वापर केला जात आहे. ‘टॉमटॉम’ या जागतिक वाहतूक अहवालात पुण्याची नोंद जगातील संथ शहरांमध्ये झाली होती. यावर उपाय म्हणून सध्या अरुंद रस्त्यांवर ‘अल्पकालीन वाहतूक नियोजन’ करून जे.एम. रोड आणि एफ.सी. रोडची वाहतूक सामावून घेण्याची क्षमता यशस्वीपणे वाढवण्यात आली आहे. १९९५ मध्ये केवळ ८६ चौरस किलोमीटर असलेले पुणे आज ३८२ चौरस किलोमीटरवर पोहोचल्यामुळे प्रशासकीय मर्यादा आल्या आहेत. मात्र, आगामी काळात उभे राहणारे १०० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आणि पोलिसांची ही हायटेक यंत्रणा यामुळे पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न नक्कीच सुटेल, अशी आशा मनोज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. रस्त्यांवरील खाजगी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी शहरात प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्किंग’चा प्रयोग राबवला पाहिजे, तसेच पुण्यातील विविध आयटी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ म्हणून पाळला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस त्यांनी यावेळी त्यांनी मांडली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद वाढविणे, युवकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर शहराच्या विकासाशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे. मेट्रो सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर पुरेशी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच जुन्या शहरातील वाहतुकीचा विचार करून लहान बससेवेचा पर्याय, नियोजनबद्ध बसथांबे आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय होणे अत्यावश्यक आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, “पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा मी सध्या सखोल अभ्यास आणि निरीक्षण करत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबविण्यात येतील. अनेक रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ व्यवस्था प्रभावीपणे लागू केल्यास वाहनतळाबाबत शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. तसेच मुंबईच्या धर्तीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.”

See also  भाजपाने लोकांची घरे पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवण्याचे काम करावे - खासदार संजय जाधव; बाणेर मध्ये मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत म्हणाले, वाहतूक कोंडीचा आरोग्यवर परिणाम होत आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार होणे आवश्यक असते; मात्र डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकल्याने उपचारांमध्ये विलंब होतो. मोठी दुर्घटना होते. वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढत असून रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच रस्त्यांवरील वाद आणि भांडणांचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

एलिस पोरे म्हणाल्या, ब्राझीलमधील यशस्वी बीआरटी मॉडेलचा उल्लेख करत त्यांनी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. बससेवा वेळेवर चालविणे, चालकांचे प्रशिक्षण, छोट्या रस्त्यांवर लहान बस सुरू करणे तसेच बसच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बससेवा वाढविण्यासाठी आवश्यक जागा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बस डे’ सारखा उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

सुरेंद्र निकम यांनी पुण्यातील वाढत्या वाहनसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. शहरात सुमारे ३० लाख दुचाकी आणि ९ लाख चारचाकी वाहने असून बहुतांश दुचाकी एकाच व्यक्तीद्वारे वापरली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वाहन नोंदणी, परवाना आणि वाहतूक नियमांचे पालन यावर भर देत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षा वाढविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाहतूक अभ्यासक व पत्रकार मंगेश कोळपकर यांनी सादरीकरणाद्वारे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतील समस्या, सद्यस्थिती आणि उपाययोजना, या बाबत सविस्तर आढावा घेतला. शहरातील वाहतूक समस्यांचे स्वरूप कसे बदलत आहे, याचे विश्लेषण त्यांनी केले.  ते म्हणाले, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची सजगता आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न पुरेसे नाहीत तर, लोकप्रतिनिधींचा दबाव आणि नागरिकांचा पाठपुरावा आवश्यक आहे. शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करून त्याची विशिष्ट कालमर्यादेत अंमलबजावणी व्हायला हवी. पुण्यातील अरुंद रस्ते, ४४ लाखांहून अधिक वाहनांची संख्या आणि वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावत आहे. तसेच शहरातील वाहतुकीचा सरासरी वेगही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. अतिक्रमणे, सक्षम व सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि सुमारे साडेतीन हजार पीएमपीएमएल बस उपलब्ध असूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

See also  भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये टेक्नो-इनोव्हा-२०२६ स्पर्धेची धमाक्यात सुरुवात

गोपाळ तिवारी यांनी यावेळी शहरातील वाहतूक कोंडी विषयी प्रश्न व सूचना मांडल्या. यशराज पारखी यांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवरील अभ्यासपूर्ण अहवाल सादर करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि शिफारशी मांडल्या. सूत्रसंचालन अर्चना शहा यांनी केले. अविनाश बागवे यांनी आभार मानले.

मेट्रोचे अधिकारी मिहीर कुलकर्णी म्हणाले, पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. मेट्रो स्टेशनजवळ दुचाकीसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी चर्चा करणार आहोत.  मेट्रो स्टेशनवर ये जा करण्यासाठी आयपीएलची बस सेवा सुरू आहेत.