शिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग -नात रक्ताचं शिवभक्तांचं

पुणे : “स्वराज्याचा सन्मान राखुया, चला रक्तदान करूया” या प्रेरणादायी संदेशासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वरवाडी,पुणे  येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १२०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी सहभाग नोंदविला. मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री विठ्ठल सेवा मंडळ (एक गाव एक गणपती), सोमेश्वरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

“नात रक्ताचं शिवभक्तांचं” या संकल्पनेवर आधारित या रक्तदान महोत्सवाचे यंदाचे सलग सहावे वर्ष होते. शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमाला युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिणामी, १२०३ रक्तदात्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम परिसरातील सर्वात मोठ्या सामाजिक उपक्रमांपैकी एक ठरला.

“तेच ठिकाण, तोच दिन पावन… रक्तदानातून घडवू नवे जीवन!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित केली. रक्ताच्या एका पिशवीमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, या जाणीवेने नागरिकांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथके, विविध सामाजिक संस्था तसेच सर्व रक्तदात्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा सामाजिक उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

यावेळी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याच्या जीवनाला नवसंजीवनी देणारे श्रेष्ठ कार्य आहे. शिवराज्याभिषेक दिनासारख्या प्रेरणादायी दिवशी नागरिकांनी दाखविलेला सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत कौतुकास्पद आहे. रक्तदानातून आपण केवळ रक्त देत नाही, तर एखाद्या कुटुंबाला आशेचा किरण देत असतो. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील.”

शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या रक्तदान महोत्सवामुळे सामाजिक सेवेला नवी उंची मिळाली असून, नागरिकांच्या विक्रमी सहभागातून मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे.

See also  रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी