मानवतेचा संदेश देत संत निरंकारी मिशनचे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य ; पिंपरी -चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान, गरजूंना अन्नदान

पिंपरी-चिंचवड : मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर ओसरल्यानंतर परिसरात साचलेला चिखल, कचरा व घाणीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ‘मानवतेची सेवा हीच ईश्वरसेवा ‘ या संदेशाला कृतीत उतरवत संत निरंकारी मिशनच्या सेवादल यांनी पूरग्रस्त भागात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना दिलासा दिला.

मिशनच्या स्वयंसेवकांनी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच पूरग्रस्त वस्त्यांमध्ये श्रमदान करत पूरग्रस्त घरांतील चिखल व कचरा हटविण्याचे कार्य केले. परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. याचबरोबर पूरग्रस्त व गरजू नागरिकांसाठी शिजवलेल्या अन्नाचे वितरण करण्यात आले. अनेक कुटुंबांना वेळेवर भोजन उपलब्ध करून देत त्यांच्या अडचणीच्या काळात आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सेवाकार्यात मिशनच्या सेवादलातील स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

संत निरंकारी मिशनचे हे सेवा कार्य सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या मानवता, प्रेम, करुणा आणि निःस्वार्थ सेवेच्या प्रेरणेतून राबविण्यात आले. समाजात जात, धर्म, भाषा किंवा पंथ यांचा भेद न करता प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, हा मिशनच्या समाजसेवेचा मूलभूत दृष्टिकोन असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

स्थानिक नागरिकांनी या सेवाकार्याचे मनापासून स्वागत करत संत निरंकारी मिशनच्या स्वयंसेवकांनी संकटकाळात दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपत्तीच्या काळात समाजासोबत खंबीरपणे उभे राहत सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

See also  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण